![]() |
शंकरदेव |
शंकरदेव
यांचे शरीर सुदृढ होते. ते भर पावसाळ्यात पूर आलेल्या ब्रह्मपुत्रेत लीलया पोहत
असत. शंकरदेव यांनी त्यांची तीर्थयात्रा 1481 साली, वयाच्या बत्तीसाव्या वर्षी सुरू केली. त्यामागे त्यांचा उद्देश जीवितकार्य
शोधणे हा होता. ते वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी म्हणजे पूर्ण एका तपाने (बारा
वर्षांनी) यात्रा पूर्ण करून परत आले. त्यांनी उत्तर भारतात पसरलेली आणि
विष्णूच्या नामघोषात दुमदुमून गेलेली वैष्णव चळवळ आणि
भक्तांच्या हृदयातील विष्णुभक्ती जवळून पाहिली. त्यांनी जगन्नाथपुरी, वाराणसी, प्रयाग, वृंदावन,
मथुरा, कुरुक्षेत्र अशा सर्व वैष्णव
तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या.
शंकरदेव
यांनी ‘सत्र' संकल्पनेचा आरंभ त्यानंतर
केला. सत्र म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक
मार्गदर्शन करणारी गुरुकुले होत. त्यांनी त्यांच्या जन्मगावी पहिले सत्र स्थापन
केले. सत्र हे एक बहुउद्देशीय केंद्र होते. शंकरदेव यांनी तशा सुमारे पाचशे
सत्रांची स्थापना केली. सत्राधिकारी असलेले आचार्य तेथील भिक्षू, विद्यार्थी आणि भक्त यांना मार्गदर्शन करत असत; त्यांचा आध्यात्मिक आणि
शैक्षणिक उत्कर्ष होण्यासाठी लक्ष देत असत.
![]() |
शंकरदेव यांचे काव्य |
‘एक सरण (शरण) हरि नाम’ हा धर्म शंकरदेव यांनी
आसामातील जनतेला आणि पर्यायाने भारतभूमीला दिलेला आहे. श्रीमद भगवद्गीता आणि भागवत पुराण यांत ज्या विचारांची पाळेमुळे रुजलेली आहेत असा कृष्णभक्तीला
वाहिलेला आणि केवळ विष्णू हे परमदैवत मानणारा महापुरुष धर्म हे शंकरदेव यांचे
योगदान आहे.
त्यांनी
त्यांच्या शंभरांहून अधिक अनुयायांना घेऊन त्यांची दुसरी यात्रा 1550 मध्ये
आरंभ केली. ते त्या यात्रेत जगन्नाथपुरी येथे अनेक संत महात्म्यांना भेटले आणि सहा
महिन्यांनी त्यांची यात्रा पूर्ण करून त्यांच्या गावी परत आले. शंकरदेव यांनी
त्यांची इहलोकीची यात्रा वयाच्या एकशेविसाव्या वर्षी 1568
साली संपवली. शंकरदेव यांनी श्रीकृष्ण हेच आराध्य दैवत आणि समाजसेवा हीच ईश्वरसेवा
मानली. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वेचले. त्यांनी नामघराच्या माध्यमातून समाजातील जातीय भेद आणि संघर्ष
मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आध्यात्मिक विचारधारेतून समाजातील सर्व
घटकांना संघटित करण्याचे बहुमोल कार्य केले. त्यांच्या त्या वैष्णव चळवळीचा आणि
विचारांचा प्रभाव आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर जनमानसावर असलेला दिसतो. शंकरदेव
यांनी भागवत धर्माची पताका ईशान्य भारताच्या सुदूर राज्यात फडकत ठेवली.
- अरिंदम अधिकारी (इंग्रजी लेख) arindam.adhikari@gmail.com
मराठी अनुवाद आर्या जोशी 9422059795 jaaryaa@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------
3 टिप्पण्या
Very informative and narrated in nice brief language.
उत्तर द्याहटवाइंग्रजी लेखाचा सुंदर असा अनुवाद !
उत्तर द्याहटवाअरिंधम आणि मराठी चकितच झालो, सुंदर लेख आणि स्तुत्य उपक्रम!💐
उत्तर द्याहटवा