मालेगाव जवळील रावळगावला वालचंद हिराचंद यांचा खासगी साखर कारखाना होता. तो आमच्या जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असावा. कारखान्याची स्वतःची ऊसाची शेती भरपूर होती. गावोगावच्या शेतकऱ्यांचा कल त्यांच्या परिसरातील क्रेशरवर ऊस नेऊन गूळ तयार करण्याकडे असायचा. अना पाटलांची क्रेशर सीजनमधे फूल चालायची. शेतकरी नंबर लावून ठेवायचे. कोणाही शेतकऱ्याचे ऊस असले तरी क्रेशरवर यायला मनाई नसायची. ऊसाच्या रसाची गरम चिगट साय ऊसाच्या चिवटीने खाण्याची मजा काही औरच असायची. रसाचा तो पाक म्हणजे एक प्रकारचा चिवट गूळच. कढईजवळ बसून मनसोक्त गूळ खायला मिळायचा. घरी असणाऱ्या बायांना किंवा लहान मुलांसाठी चाटू भरून घेऊन जायचो. ऊसाचे टिपरू ऊसाच्या पाकात फिरवले, की गुळ ऊसाला चिकटून यायचा. नंतर तो केंव्हाही खाल्ला तरी चालायचे. माझ्या बाबतीत सारे गाव मामाचे. कोणाचाही ऊस क्रेशरवर आलेला असो मला नेहमीच प्रवेश मिळायचा. अजूनही त्या गोड मधूर जिभेला चटका लावणाऱ्या ताज्या गुळाची चव जिभेवर रेंगाळत आहे असे वाटते.
नंतरच्या काळात सहकारी साखर कारखाने वाढत गेले. रावळगाव व्यतिरिक्त गिरणा सहकारी साखर कारखाना निघाला. साखर सम्राट निर्माण झाले. कारखान्यांची दुकानदारी चालावी म्हणून, की काय महाराष्ट्रात गूळ तयार करण्यावर बंदी आली. गुळाची गुऱ्हाळे बंद पडली. गुळाची साय गेली. चाटूही गेले. काकवी नाहीशी झाली. क्रेशरच्या जागा नंतर बरेच दिवस भग्न अवशेषासारख्या पडलेल्या दिसायच्या. हळुहळू, सर्व अवशेष नष्ट होत गेले. एकोणसत्तरच्या महापुरात नदीकाठची मोठ मोठी झाडे वाहून गेली. ते दिवसच वेगळे होते. सुखसुविधा नव्हत्या पण जीवन आरोग्यदायी होते. पुढे पुढे बागायती शेती कमी होत गेली. इतर ठिकाणी बागायत वाढले तरी इतर नगदी पिकांकडे शेतकरी वळला. ऊसाची शेती कमी झाली.
(कोल्हापूर भागात गूळ तयार करण्यास परवानगी आहे.)
- गोविंद बी. मोरे 95884 31912 gm24507@gmail.com
गोविंद मोरे मूळचे धुळ्याच्या चौगावचे. ते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकच्या 'मराठा विद्या प्रसारक' या समाजसंस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त 2012 एप्रिलमध्ये झाले. त्यांनी कोरोनाकाळात जुन्या आठवणी लिहिल्या आणि सोशल मीडियावर शेअर केल्या. ते सध्या सिन्नर येथे राहतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
1 टिप्पण्या
छान बापू,
उत्तर द्याहटवाखरोखरच आपण थिंक महाराष्ट्र च्या माध्यमातून गुळाच्या काकवीची गंमत ही कथा सुंदरपणे प्रस्तूत केली.
आपल्या मामाच्या गावी आपलं शालेय जीवनातील सुंदर किस्सा आपण वर्णिणेला आहे.
आमचे बापू म्हणजे मोरे सर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आठवणीतील गावाकडील कथा, शालेय शैक्षणिक सहलीतील मजेदार प्रसंग तसेच अहिराणी भाषेतील माय मराठी साहित्य ठेवा ह्याचे विशेष भाग प्रस्तुत करून नवीन पिढी समोर जुन्या घटना आणि प्रसंगांचा देखावा सादर केला. नव्या पिढीने त्या स्मरणात ठेवाव्यात हीच मापक अपेक्षा.
संतोष गवळी. मालाड, मुंबई.