डॉ. सलगर यांचे घर
मुंबईतील जोगेश्वरीची सरस्वती बाग. त्या गृहनिर्माण सोसायटीच्या स्थापनेला 2019 साली शंभर वर्षें पूर्ण झाली. गजबजत्या जोगेश्वरी स्थानकापासून पूर्वेकडे जेमतेम आठ-दहा मिनिटे चालले, की उजव्या हाताला सरस्वती बाग ही दगडी बंगल्यांची वसाहत दिसते. त्या बंगल्यांच्या रचना तीन प्रकारच्या आहेत. त्या कॉलनीत माणूस शिरला आणि एकेक घर ओलांडत निघाला, की तो मुंबईपासून जणू एकेक कोस दूर जातो! तो थोड्या वेळात पोचतो कारवारी कोकणात. गौड सारस्वतांची ती सहकारी सोसायटी मुंबईत कारवार उभे करण्याच्या कल्पनेतूनच 1914 मध्ये कागदावर आली. तिची नोंदणी 1919 पर्यंत झाली. मार्शलँड प्राइज कंपनी या ब्रिटिश कंपनीला बांधकामाचे कंत्राट दिले गेले होते. तेव्हा एक मध्यवर्ती इमारत ऑफिससाठी बांधली. ती तर वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणावी इतकी सुंदर आहे.
         
मुख्यतः कारवारी मंडळी तेथे 1923 मध्ये राहू लागली. विशेष म्हणजे त्या सोसायटीचे शेअर विकण्यात आले. ज्यांना तेथे राहायचे नव्हते, अशांनीही समाजबांधवांसाठी खुशीने भागभांडवल विकत घेतले! तसे एकूण दोनशेबावन्न भागधारक आहेत. त्या अवाढव्य जमिनीवर अगदी नेटकी दुमजली घरे बांधण्यात आली. तेथे मंगेशीचा रामेश्वर सुबक मंदिरात आहे. त्याची पालखी व इतर उत्सव वर्षभर जोरदार होत राहतात. गणेशोत्सवही सुरू झाला. त्या अकरा दिवसांच्या उत्सवात किशोरी अमोणकर यांच्यापासून साऱ्यांनी हजेरी लावली आहे. गणेशोत्सवाची शताब्दी जवळ आली आहे.
          रहिवाशांनी कोकण-गोव्यातील वृक्षसंपदा तेथे रुजवली आणि ती इतकी घनदाट झाली, की साठी-सत्तरीतील तेथील रहिवासी आम्ही कसे सूरपारंब्या खेळायचोहे सांगताना रमून जातात. तेथेच मग तेव्हाच्या ठाणा बोर्डाची शाळा चालू झाली. हीच ती बिगरी...
पुलंची  बिगरी
असावी. पुलं त्या सोसायटीत काही वर्षें राहिले, खेळले. पु.ल.देशपांडे यांची जन्मशताब्दी व
सरस्वती बागचीही शताब्दी 2019 मध्ये एकाचवेळी होऊन गेली, हा योगायोग. पुलंच्या बिगरी ते मॅट्रिकमधील येथील शाळा खंगली असली, तरी उभी आहे. रहिवासी पुलंची म्हणून दोन छान बंगल्या त्या परिसरात दाखवल्या जातात. त्यांतील एक देशपांड्यांची व दुसरी दुभाषी यांची. म्हणजे पुलंच्या आजोळची असावी. पुलं असंख्य बोली सहज आत्मसात करत. त्यांतील अनेक त्यांच्या कानावर तेथेच पडल्या. त्यांनी विविध प्रकारची खाद्यसंस्कृतीही लहानपणी तेथे अनुभवली. पुढे सरस्वती बागेतील रहिवाशांना पुलं पत्रे पाठवत, पण त्यांचे तेथे येणे मात्र फार झाले नाही. त्याखेरीज अॅडमिरल जयंत नाडकर्णी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सदाशिव तिनईकर, संघाचे भास्करराव मुंडले असे तालेवार रहिवासी तेथे राहून गेले आहेत. अनेक पिढ्या एकत्र वाढलेल्या आणि राहिलेल्या त्या वसाहतीचे मोठ्ठे कुटुंब होऊन गेले आहे.
         
रामेश्वर मंदिर
सरस्वती बागला टाकी महाराजया आध्यात्मिक पुरुषाचा वारसा आहे. टाकी महाराजांच्या प्रेरणेतून तेथे दत्तमंदिर उभे राहिले आणि एका नव्या उत्सवाची भर पडली. सद्भक्ती प्रसारक मंडळ स्थापन झाले. त्याच बरोबर, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कॉम्रेड बाळकृष्ण धुमे आणि पीटर अल्वारिस यांच्या आंदोलनाचाही बागेला वारसा आहे. तेथे त्या चळवळीचे कार्यालय होते. तेथेच जन्म झालेले डॉ. रमेश सलगर सांगतात, की बहुतेक घरांमधील मुले परदेशी गेली आहेत. आम्ही आमच्या मजबूत असणाऱ्या दगडी, कौलारू घरांच्या रूपाने एक प्रकारे इतिहास जपत व जगत आहोत. सूरपारंब्या खेळणारी पिढी सत्तरीच्यापुढे  गेली आहे आणि झाडे असली, तरी त्यावर खेळण्यास मुले नाहीत.
सरस्वती बागेतील वृक्षसंपदा
          बुद्धिबळाच्या पटाचा आकार असणारी सोसायटी तशी का बांधली गेली ते माहीत आहे का? प्रत्येकाला स्वत:ची बाग करता यावी म्हणून! प्रत्येकाच्या आजोबांनी लावलेला आंबा आणि फणसही तेथे आहे ती झाडे रसाळ फळे देतात. मध्ये एक मोठे मैदान आहे. शेजारी त्या काळात बांधलेली शाळेची सुबक इमारत. प्रचंड मोठी विहीर आणि त्या विहिरीचे वसाहतभर फिरवलेले पाणी. इतकेच नाही, तर वापरलेल्या पाण्याच्या शुद्धिकरणाचा प्लांट आणि त्या वापरलेल्या पाण्यावर एकेकाळी वसाहतीतच पिकणारा भाज्यांचा मळा. तेथे आता फार बदल झाले आहेत. चार-पाच मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सरस्वती बागेत फक्त कारवारी लोकच नाहीत तर बाहेरचे लोकही बरेच आले आहेत.  
        
 डॉ. सलगर यांचे वय एकोणऐंशी आहे. ते तेथील सर्वाधिक जुने रहिवासी आहेत. ते म्हणाले, की सरस्वती बागेला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा मंडप उभारून पाच दिवसांचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी एनकेजीएसबी बँक, एक बिझनेसमन आणि इतर काही लोक यांनी मिळून पैसे दिले. त्यातून पाच दिवसांचा कार्यक्रम झाला. त्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खेळांचे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी चमचा गोटी हा खेळही ठेवण्यात आला होता. त्यात सलगर पहिलेदेखील आले होते. इतर कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा, अंताक्षरी, खाद्यमेळावा, आनंदमेळावा यांचे आयोजन होते. त्यात अशोक पत्की, महापौर रवींद्र वायकर असे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रमेश सलगर 9930214476
छायाचित्रे सहाय्य - लीना सलगर आणि शैलेश जाधव
- सारंग दर्शने 9821504025  darshanesarang@gmail.com
सारंग शंतनू दर्शने हे दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे (मुंबई) वरिष्ठ सहसंपादक आहेत. त्यांनी सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता या वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली आहे. दर्शने बी. कॉम - एम. ए. झाले. त्याखेरीज त्यांनी हस्तलिखित शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत विविध विद्याशाखांचा अभ्यास केला आहे. त्यांनी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने पाकिस्तानचा अभ्यासदौरा केला आहे. त्यांनी दुसरा गांधी अर्थात राळेगणचे अण्णा (चरित्र), शोध राजीव हत्येचा (अनुवाद), मीरा आणि महात्मा (अनुवाद), कुमार माझा सखा (शब्दांकन), ग्रंथांच्या सहवासात (संपादन), स्थित्यंतर (संपादन), ग्रंथाली 35, गांगल 70 (लेखन सहभाग) आणि अटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी या पुस्तकांचे लेखन केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सरस्वती बागेची काही छायाचित्रे - 










---------------------------------------------------------------------------------------------------------------------