अनंत देशमुख
ठाण्याचे अनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक गेल्या दशकभरात वाढला आहे; किंबहुना, देशमुख यांना सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या नामवंत लेखक-समीक्षकांच्या पिढीनंतर त्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान लाभले आहे. देशमुख प्राध्यापक म्हणून आणि मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून 31 डिसेंबर 2007 ला एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या (नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ) पदव्युत्तर विभागातून निवृत्त झाले. त्यांनी आयुष्याचा सर्वाधिक काळ विद्यादान व संशोधन यांतच व्यतीत केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थी एम फिल व दहा विद्यार्थी पीएच डी झाले आहेत. निवृत्तीनंतरही, त्यांचे लेखन-संशोधन हे कार्य जोमात सुरू राहिले आहे. देशमुख यांची खासीयत दुर्लक्षित विषय हाताळणे व प्रसिद्ध व्यक्तीच्या चरित्राचा प्रकाशात न आलेला, महत्त्वाचा भाग अधोरेखित करणे ही राहिली आहे. त्यामुळे मराठी साहित्य संशोधनात मोलाची भर पडत आलेली आहे. ते सध्यादेखील आनंदीबाई जोशी यांचे नव्हे, तर गोपाळराव जोशी यांचे चरित्र लिहीत आहेत!
         
देशमुख यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक पुस्तकात उपेक्षित, दुर्लक्षित क्षेत्राचे संशोधन अधिकतर दिसते. बाळ गंगाधर टिळक यांची चरित्रे उपलब्ध आहेत; पण त्यांचे पुत्र श्रीधरपंत यांचे चरित्र नाही हे देशमुख यांच्या लक्षात आले. श्रीधरपंत हे सनातनी विचारांचे नव्हते, तर पुरोगामी होते. त्यांचा चळवळींशी काही संबंध होता का? तत्कालीन रूढींबद्दल त्यांची मते काय होती? त्यांनी वयाच्या केवळ बत्तीसाव्या वर्षी आत्महत्या का केली? अशा प्रश्नांची उत्तरे शोधत देशमुख यांनी संशोधन केले.  त्यातून त्यांचे श्रीधर बळवंत टिळकहे चरित्र (नवचैतन्य प्रकाशन) सिद्ध झाले. श्रीधर बळवंत टिळक यांनी लिहिलेले रँग्लर परांजपे यांचे चरित्र (गंधर्ववेद प्रकाशन, पुणे) प्रसिद्ध आहे. त्यांनी 'रंगांचा जादूगार' (दीनानाथ दलाल) आणि 'केतकर मास्तर' ही दोन चरित्रेही लिहिली आहेत. एरवीही, त्यांनी कथा, काव्य, कादंबरी या सर्व प्रकारांत समीक्षा केलेली आहे.

          देशमुख यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी '.धों.कर्वे' यांच्याबद्दल केलेले संशोधन! त्यांनी कर्वे यांचे चरित्र नव्याने लिहून त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व उजेडात आणले. त्यांनी तो स्वतंत्र प्रकल्प सन 2002-03 मध्ये राबवला. देशमुख यांनी एस.एन.डी.टी.विद्यापीठात अठरा-एकोणीस वर्षें सेवा केल्यामुळे त्या विद्यापीठाशी त्यांचा वेगळा भावबंध निर्माण झाला आहे. ते विद्यापीठ मूळचे अण्णा ऊर्फ धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले. अण्णांचे चरित्र आधीच प्रकाशित झाले होते; तसेच, .धों.कर्वे यांचे चरित्रही य.दि.फडके यांनी लिहिले होते. देशमुख यांनी वेगवेगळ्या ग्रंथालयांत धुळीत पडलेलेसमाजस्वास्थ्यचे अंक
मिळवले. त्यांनी सांगितले, की "मला आणखी काही संदर्भ पाहण्यासाठी ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर येथील ग्रंथालयांमध्ये जावे लागले. त्यांचे इंग्रजी लेखनही प्राप्त केले. संदर्भ साधने म्हणून बराच दुर्लक्षित मजकूर माझ्या हाती आला. मी जंतुनाशके मारलेल्या वृत्तपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या संचिका पाहिल्या. अखेर, र.धों.चे चरित्र लिहून झाले. आणि विपुल माहिती असलेले ते लेखन पद्मगंधा प्रकाशनने 'समाजस्वास्थ्य'कार : . धों. कर्वे यांचे चरित्र' या नावाने आठ खंडांत प्रकाशित केले आहे. त्यात र.धों.संबंधी मूलभूत स्वरूपाची विपुल माहिती आहे. पुढे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानेही र.धों.चे चरित्र प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यासाठी अनंत देशमुख यांनी पुन्हा वेगळे, नवे पुस्तक लिहिले. ते 'महाराष्ट्राचे शिल्पकार प्रो..धों. कर्वे' या नावाने प्रकाशित झाले आहे. मैत्रेय प्रकाशननेही .धों. कर्वे - व्यक्तित्व आणि कर्तृत्वअसे दुसरे वेगळे पुस्तक देशमुख यांच्याकडून लिहवून घेतले. अनंत देशमुख यांनी र.धों. कर्वे यांच्यासंबंधांत केलेले विविध लेखन हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास म्हणून अतिशय महत्त्वाचा ऐवज ठरला आहे. .धों. यांनी ज्या काळात संततिनियमनाचा विचार हा अतिशय संवेदनशील होता त्या काळात समाजस्वास्थ्याचा विचार करून समाजावर एक वेगळा संस्कार केला.

रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यासंबंधीच्या संशोधनामुळे देशमुख यांचा नाट्यजगाशी प्रत्यक्ष संबंधदेखील आला. नाटककार अजित दळवी यांनीसमाजस्वास्थ्यहे नाटक लिहिले. दिग्दर्शक अतुल पेठे यांना ते 'कोर्टरूम ड्रामा' या स्वरूपात हवे होते. त्यांना वेळोवेळी काही माहिती हवी असायची. ते देशमुख यांना विचारत असत. त्यांनी त्या नाटकाचा शेवटदेखील देशमुख यांच्याकडून काही तपशील मागवून बदलला आहे.
देशमुख हे मूळ अलिबागचे. त्यांच्या परिवारातील बंधुभगिनी, मुले, सर्व उच्चशिक्षित आहेत. देशमुख  यांची पत्नी विनोदिनी एम एससी (स्टॅटिस्टिक्स) असून महर्षी दयानंद कॉलेज (परळ, मुंबई) येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी 2004 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशमुख दाम्पत्याला दोन मुलगे असून, दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये अमेरिकेत कार्यरत आहेत.
          अनंत देशमुख यांच्या पीएच डीचा विषयकुसुमावतींचे साहित्यहा होता. कुसुमावतींनी त्यांच्या लेखनाने मराठी कथा, कविता, समीक्षा, कादंबरी अशा सर्व साहित्यप्रकारांत स्थान मिळवले होते. देशमुख यांनी 'अनन्वय' (स्वयम पब्लिकेशन) या त्यांच्या आत्मचरित्रात, ते पीएच डीचा अभ्यास करत असताना कवी अनिल यांच्याशी झालेल्या भेटी; तसेच, इतर साहित्यिकांशी झालेल्या चर्चा यांचा उल्लेख केला आहे. साहित्य-समीक्षा-वाड्मयेतिहास-संशोधन हे देशमुख यांचे क्षेत्र राहिल्याने ग्रंथ-ग्रंथालये यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आहे. त्यांना अनेक संदर्भग्रंथांविषयी माहिती असते. ती ते अनेकांना पुरवत असतात. विजया राजाध्यक्ष त्यांच्याबद्दल एकदा म्हणाल्या, “देशमुख यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. अनेक ग्रंथ, ग्रंथकार, वाङ्मयीन घटना, वाद, नियतकालिकं यांच्यासंबंधीचं त्यांचं ज्ञान पक्कं असतं.” देशमुख आलोचना मासिकाच्या गटात कार्यरत होते. वसंत दावतर यांनी चालवलेले ते मासिक. त्यांच्या भोवती अरुणा दुभाषी, दिगंबर पाध्ये, निलकंठ कदम, . दि. पुंडे, जयंत वष्ट ही मंडळी असत. त्यांच्या आलोचना' या मासिकाच्या निमित्ताने बराच काळ चर्चा चालत. सर्वजण नायगाव-दादर येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भेटत असत. 'आलोचनाहे मासिक पुस्तक परिचय, पुस्तक परीक्षणे व एकूण ग्रंथव्यवहार यासाठी दावतर यांनी निष्ठेने चालवले. देशमुख यांनी अनामिक राहून त्यामध्ये भरपूर समीक्षा लिहिली आहे.
          देशमुख यांना बालपणापासूनच वाङ्मयीन वातावरण लाभले. त्याबाबत उल्लेख करताना त्यांनी सांगितले की आजोबांना वाचनाची आवड होती. त्यांची संचित पुस्तके आम्हा मुलांच्या हाती एके दिवशी माळ्यावर लागली. आम्ही वडिलांकडे पुस्तके मागू लागलो, मग गोडी लागली. आई चातुर्मासातरामविजय, ‘हरिविजयहे पाठ वाचन करत असे. चार लोक ऐकण्यास येत. सुधीर फडके यांचा एक शिष्यगीत रामायणाचे प्रयोग करत असे. ते साहित्य कानावर पडले.त्यांचे शालेय शिक्षण आणि आजुबाजूचे वातावरण यांचा लेखकाच्या जडणघडणीत वाटा याबद्दल प्रश्न विचारला असता देशमुख म्हणाले, कीमाझे शिक्षण अनेक शाळांत झाले. आधी बागदांडे येथे प्रायमरी, तर पुढे सारळला आणि मग कराडच्याटिळक हायस्कूलमध्ये. त्यानंतर जैतापूरलान्यू इंग्लिश हायस्कूलला.” त्यांनी कराडचा अनुभव सांगण्यासारखा आहे म्हणून मुद्दाम नमूद केला. अनंत देशमुख हे 1962-63 साली कराडच्या टिळक हायस्कूलला होते. नेमके त्यावेळी चीनने युद्ध पुकारल्याने वातावरण वेगळे झाले. पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केले. यशवंतरावांनी दिल्लीला जाताना एका प्रचंड मोठ्या सभेसमोर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाणारचअसे वक्तव्य केले, ते प्रसिद्ध झाले; तसेच, गदिमांचेजिंकू किंवा मरूहे गीतही गाजत होते. ‘बर्फाचे तट पेटुनि उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळलेही आणि अशी समरगीते लोकांच्या तोंडी होती. तशा वातावरणात अनंत देशमुख कराडला, यशवंतराव यांच्या जन्मगावी होते. देशमुख म्हणाले, की त्यांच्यात देशभक्ती आणि साहित्य यांचे संस्कार असे होत गेले.
        
           देशमुख महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अलिबागच्या कॉलेजमध्ये मधु पाटील आणि मा.ना.आचार्य हे दोघे मातब्बर प्राध्यापक तेथे शिकवत होते. त्यांचा देशमुख यांना घडवण्यात मोलाचा वाटा आहे असे ते सांगतात. आचार्य हे समीक्षक वा ल कुलकर्णी यांचे शिष्य. ते नेहमी वा ल यांना वाखाणत. त्यामुळे देशमुख यांनीही वा ल कुलकर्णी यांच्या समीक्षेचा अभ्यास केला. त्यामुळेमी पुढे समीक्षेकडे वळलोअसे देशमुख नमूद करतात. आचार्य हे उत्तम शिकवत; त्याचबरोबर, अभ्यासात समाविष्ट नसलेल्या अनेक ग्रंथांवर चर्चा करत. इंग्रजीद मून अँड सिक्स पेन्ससारख्या कादंबऱ्या आणि मराठीसावित्री, ‘काळोखाचे अंगण, ‘चांगुणा यांसारख्या कादंबऱ्या, अन्य पुस्तके यांची चर्चा त्यांना विद्यार्थिदशेत ऐकण्यास मिळाली. त्यातून अभिजात साहित्याचे स्वरूप लक्षात येत गेले अशा आठवणी सांगून अनंत देशमुख म्हणाले, की बहुधा माझ्या अशा तयारीमुळे श्री.पु. भागवत यांनी एका महत्त्वाच्या पुस्तकासाठी संदर्भ सूची लिहिण्याचे काम मला दिले होते. ते पुस्तक होते जी..कुलकर्णी यांनी सुनीताबाई देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचे. त्यात जीएंची पत्रे वाचताना त्यांचे विस्तृत सर्वस्पर्शी वाचन, विषयासंबंधीचे अगाध ज्ञान, व्यक्तींसंबंधीची त्यांची घट्ट आणि ठाम मते, मराठी भाषेवर प्रभुत्व हे सारे पाहून मी थक्क झालो. प्रसिद्ध समीक्षक स.गं. मालशे यांचाही सहवास मला मिळाला. ‘सत्यशोधनहे मालशे यांच्या संशोधनाचे महत्त्वपूर्ण सूत्र होते. त्यांचे ते सूत्र मी स्वीकारले. सत्याची कास कधीच सोडली नाही.” देशमुख हे बोलत असताना त्यांच्या आवाजात रास्त अभिमान होता. अनंत देशमुख यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. त्यांच्या संशोधनात्मक लेखनात त्यांचेनाट्यविचार(नीहारा प्रकाशन, 1988), ‘आधुनिक नाट्यविचार(पुष्प प्रकाशन, 1993) ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या मूळ प्रतींचा अभ्यास करून विशाखाभोवती' (प्रतिमा प्रकाशन, 2002) हे पुस्तक लिहिले आहे.  ‘गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य, ‘भैरप्पांचे कादंबरीविश्व, ‘रंगयात्रा, ‘मराठी साहित्य संशोधनअशा पुस्तकांमध्ये देशमुख यांचे समीक्षात्मक लेखन समाविष्ट आहे.

          अनंत देशमुख यांनी काही काळ डॉकयार्ड येथील जहाज दुरुस्तीच्या कारखान्यात कामाचाही अनुभव घेतला आहे. त्याचे वर्णन ते झकास करतात, “तेथे सर्व भंगार आणि स्टील पडलेले असायचे. सर्वत्र लोखंडाचे तुकडे पडलेले, ऑक्सिजन सिलिंडर्स, मोठमोठ्या क्रेन्स, वजनदार हत्यारे, प्लेट्स पसरलेल्या असायच्या. त्यांतच भल्यामोठया करवतींनी लाकडाचे ओंडके कापले जायचे, शेजारच्या टिन स्मिथी खात्यात अॅल्युमिनियमच्या पत्र्यांचे डबे बनवले जायचे. त्या सर्वांचा प्रचंड कोलाहल व कानठळ्या बसवणारा आवाज सतत चालू असायचा. तशा सर्व वातावरणात मी कंटाळून गेलो व निराश झालो.” पुढे त्यांची चांगल्या खात्यात बदलीही झाली. परंतु मूळ पिंड साहित्याचा असल्याने ते विद्यादानाकडे वळले
          अनंत देशमुख यांना टेबल टेनिस खेळण्याचा छंद होता. ते प्राचार्य रा.तु. कुलकर्णी यांच्याबरोबर  टेनिसही खेळत. देशमुख यांनी तेथे त्या खेळाचे प्राथमिक धडे घेतले. पुढे रंगीत टीव्ही सुरू झाला. त्यावर विंबल्डन सामन्यांचा भरपूर आनंद देशमुख लुटत आले आहेत. अशा छंदांसाठी वेळ देत असताना ते साहित्यसंशोधनातच जास्तीत जास्त रमलेले दिसतात.
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या 'तो मी नव्हेच'सुयोगच्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी 'कोवळी उन्हे' या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

 

----------------------------------------------------------------------------------------------------------------